Description
माणसांपेक्षा झाडे नेहमीच जवळची वाटत गेली. निसर्गातल्या हिरव्या हाका ऐकू येत राहिल्या. बालपणातला अशक्तपणा पुस्तकांच्या जगात घेऊन गेला. त्यातूनच वेळ मिळेल तेव्हा झाडावर चढून पुस्तके वाचत बसायचो. तिन्ही ऋतूंतील झाडे, वाटा, डोंगर न्याहाळण्याचा नाद लागला.
पावसाळ्यात उगवणारी लुसलुशीत हिरवळ; पिंपळ-वड यांवरची कोवळी पालवी, चिंचेचा आंबट-तुरट मोहोर, झाडांखालची मऊ, साथीसारखी घट्ट सावली; आंब्याचा घनगर्द बहर, गवतांच्या पात्यांवरील दवबिंदू आणि संध्याकाळी श्रांत पाखरांच्या लगबगीने नादावणारे झाड यांची वेगवेगळी रूपे मनात भिनत राहिली. दिवसा सुंदर आणि जवळची वाटणारी झाडे रात्री भेडसावणारी वाटली. तशी भोवतालच्या माणसांची रूपेही झाडपानांच्या भाषेत समजू लागली. झाडावरच्या कविता त्यातूनच मिळाल्या. त्या मोजक्या रचना वाचताना नकळत विचार आला; झाड ही मोठी जटील गोष्ट आहे. जमिनीवर दिसणाऱ्या झाडांची जमिनीखालची अदृश्य वाढही तितकीच महत्त्वाची आहे. जिव्हाळा शोधणारी मुळे तितकीच मोलाची आहेत. त्यासाठी झाडांना आणखी सूक्ष्मपणे वाचता यायला पाहिजे. या ओढीतून लक्षात आले हिरवाई ही सर्वांना आनंद देणारी शाश्वत गोष्ट पानांमुळेच आहे. झाडांना शोभा देणारी पाने ही महत्त्वाची बाब आहे. पानांचे आणि हिरवाईचे बंधसूत्र सापडल्यानंतर शोध सुरू झाला. पानांच्या वेगवेगळ्या वागण्याचा! त्यातून साकारल्या पहिल्या पाच पानकविता..! कविता आकाराने छोट्या पण तात्त्विक आशय घेऊन आलेल्या… १९९८ मध्ये ‘अनुष्टुभ’ने पहिल्यांदा प्रकाशित केल्या. मग पानांबद्दलचे चिंतन चालूच राहिले. सर्व सृष्टीचा आदिम आधार असणारे पान एरवी फुलांपेक्षा साहित्यात बऱ्यापैकी उपेक्षित राहिले असे लक्षात आले. दैनंदिन व्यवहारात पानावाचून ‘पान’ हलत नसले तरी कवितेत त्याचे पाहिजे तेवढे प्रतिबिंब उमटल्याचे दिसले नाही.
पालेभाज्या खाताना, झाडाखाली बसताना, पत्रावळी वापरताना, पानांचा काढा घेताना, पाचोळा झाडताना अशा अनेक रूपात पाने नित्य भेटत असतात. पण आत्यंतिक सवयींमुळे आपण त्यांना गृहीत धरतो असे वाटले. आणि भोवताल तर वेगाने प्रदूषित होत चाललेले. निखळ मैत्र, निरपेक्ष प्रेम आणि नात्यांमधील ओलावा या गोष्टी उंबराच्या फुलांइतक्याच दुर्मिळ आणि दुर्लभ होत चाललेल्या .. माणुसकी हा बुळेपणा आणि सुसंस्कृतपणा हा खुळचटपणा मानणारी;तरुणाई डी. जे. च्या तालावर थिरकू लागली. मालिका, धारावाहिके यांतून डाव, प्रतिडाव, कुटुंब उद्ध्वस्त करणारी पात्रे दिसू लागली. सगळीकडे नाचगाण्यांचे कार्यक्रम भरात आलेले, हायवेच्या नावाखाली झाडांची होणारी कत्तल, शहरीकरणाच्या वेगात मुलांच्या संगोपनात होणारी हेळसांड आणि वृद्धांना अडगळ समजणारे ‘कमावते’ लोक यांचा परिणाम मनावर होत गेला. एक अस्वस्थता अंगात ठणकत राहिली. आणि माणसांना तर उपदेश नको वाटतो..! म्हणून ही सगळी खदखद, अस्वस्थता ‘ पानबोली’तून कागदावर मांडत गेलो. एका ओळीत एक शब्द घेऊन रचनेत प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त सोप्या शब्दांत गंभीर आशय मांडता येतो का ते पाहिले.
आणि या सगळ्या धडपडीतून आकाराला आले ५७ रचनांचे पर्णसुक्त .. !
- संजय बोरुडे, (साप्ता. साधना, २१ एप्रिल २०१२,पृ. २६ )
Reviews
There are no reviews yet.